Saturday, 23 April 2016

Nil Battey Sannata...😢

निल बटे सन्नाटा सिनेमा आपल्याला स्वप्न पहायला आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करायला शिकवतो. एका प्रसंगात एक कामवाली बाई जेव्हा चपराशाची नोकरी चांगली नाही असे म्हणते तेव्हा तिचे वेगळेपण आपल्याला जाणवते.

स्वतः मोठे होणे दूर पण मोठे स्वप्नं बघायचीसुद्धा तुझी लायकी नाही असे सगळे जग ओरडून सांगत असतांना ते स्वप्न जिवंत ठेवणे किती अवघड असते हे ज्याने अनुभवले त्यालाच समजू शकेल..

यातली आई ते स्वप्न जगवते आणि त्यासाठी खस्ता खाऊन ते पूर्ण सुद्धा करते. हा सिनेमा पाहतांना अनेक गोष्टी भूतकाळात घेऊन गेल्या...


सेल्स प्रोफाइल मधल्या माणसाने incentives च्या बाहेर जास्त विचार करू नये असे आमचा बॉस म्हणायचा.. रिस्पेक्ट वगैरे हवा असेल तर इकडे कशाला आलात असेही ते म्हणायचे... तुमचा तो माज आणि आमचा तो अभिमान अशा वातावरणात कोणाच्या सेल्फ रिस्पेक्टच्या चिंधड्या उडाल्या तरी जगाला त्याचे सोयरसुतक नसते...

सिनेमा पाहतांना आमच्या घरी काम करणाऱ्या सगळ्या कामवाल्या बायका आठवल्या.. त्यांची आमच्या वयाची मुले आठवली, ज्यांनी लहानपणी आमच्यासोबत धिंगाणा केला पण दहावीनंतर शाळा सोडली ती कायमची...

आमचा शांत आणि सुस्वभावी वॉचमन दिनेश आठवला जो रात्री शाळेत जात असे.. माझ्यासोबत दहावीला होता आता कुठे असेल तो???

माझ्यासोबत डेटा एन्ट्रीचे डेली वेजेसवर काम करणारा मित्र विलास आठवला... शेवटचा भेटला तेव्हा तो एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये कामाला होता आणि मी मुंबईला स्वप्न गाठोड्यात बांधून घेऊन निघालो होतो..त्याने मला ओळख दिली नाही...आणि मलाही अवघडल्यासारखे वाटले...
माझे आयुष्य बदलले पण तो कुठे असेल????

स्वरा भास्कर ला ठिकठिकाणी काम करतांना पाहून आमचे बाबा आठवले ज्यांनी ढोरासारखी मेहनत करून आम्हाला मिडल क्लास मध्ये आणले... आईची कळकळ आणि आमची बेफिकीर वृत्ती सुद्धा आठवली...

स्वरा भास्कर च्या मुलीचे वर्तन पाहून आम्ही घेतलेले लोकांचे तळतळाट आठवले... आपल्याला सोडून गेलेली माणसे यशस्वी आयुष्य जगत असतांना 'आपण त्यांच्या लायक नाही म्हणून ते गेले' हा भाव आठवला...

आणि जे जे आपल्याला नाकारले गेले ते ते सगळे परत मिळवायचे ही जिद्द सुद्धा आठवली...

सिनेमा संपून 1 तास झाला........पण अजूनही गळ्याशी दुखत आहे... पुरुषाने रडू नये म्हणतात.....

असो. सिनेमा नक्की पहा आणि कसा वाटला तेही कळवा....

सुंदर लोक..😊

आता एका काळ्या सायकलवर लिहिलेले  वाचले... "सायकल सोडून बोला"
असे वाटले आपल्या कामावर आणि आयुष्यावर प्रचंड प्रेम असलेला माणूसच ही सायकल चालवत असेल...

सध्या बिल्डिंग मध्ये नवीन कन्स्ट्रक्शन चालू असल्याने बरेच मजूर आले आहेत, त्यांच्यातल्याच एकाची असावी ही सायकल...:)

आपल्या कामावर प्रेम असणारा एक बेस्ट बसचा कंडक्टर एकदा भेटला होता. परळ ते चेंबूर बस मध्ये दुपारी गर्दी नसल्याने तो गप्पा मारत होता.. मला म्हणाला आपल्या कामावर आपले फार प्रेम आहे... आणि त्याने आपण as a कंडक्टर लोकांसाठी जे करू शकतो ते संगीतले...फार छान वाटले त्याला भेटून आणि म्हटलं आपण तर या मानाने बरेच बेटर आहोत की

एका ट्रकवर लिहिले होते---
"मालिक का पैसा और ड्रायव्हर का पसीना,
बनके निकली हसीना....."

याचा अर्थ तो ड्रायव्हर आपल्या ट्रककडे प्रेयसी म्हणून पाहत असेल आणि तशी काळजी घेत असेल असे वाटले...

नवी मुंबईत गायकवाड नावाचा एक रिक्षावाला आहे. रिक्षात त्याने पेपर ठेवलेले असतात आणि व्यसनमुक्तीबद्दल लोकांना सांगत असतो, अपंग आणि गरिबांना फुकट पाहिजे तिकडे सोडतो. मी त्याला जास्तीचे पैसे देऊ केले तर त्याने ते नम्रपणे नाकारले आणि कणा कविता आठवली...

असे सुंदर लोक तुम्हालाही भेटोत ही शुभेच्छा... Have a great weekend

खरे हितचिंतक...😊

आपले जुने मित्र खरे वेलविशर (हितचिंतक) असतात.. नोकरीच्या निमित्ताने भेटणारे लोक मित्र म्हणवून घेतात पण अपवाद वगळता ते गोड भूभुचे कातडे पांघरलेले लांडगेच असतात..वेळ आली की लचका तोडणारे...

आमचा एक मित्र सध्या डेन्मार्कला महिनाभराच्या प्रोजेक्टसाठी गेला आहे.. सॉफ्टवेअरवाला असला तरी सेन्सिबल आहे म्हणून आमचा खास आहे... हाहा... बायकोमुलाना सोडून एकटा असल्याने आम्हाला आज आमच्या व्हाट्सअँप ग्रुपवर म्हणे या डेन्मार्कच्या *** **... खूप बोर झालोय...

त्यावर आमचा दुसरा मित्र आनल्या म्हणाला हो रे ***** मी पण एकटाच आहे...आणि xx xxच्या पण हिची हि... हाहाहा

काही वर्षांपूर्वी Reliance Capital आमच्या कॅम्पसला आली होती..काही दिवसांपूर्वी औरंगाबादला त्यांच्या कॅम्पसला पण ते गेले होते... त्याचे तेव्हा सिलेक्शन झाले नाही.

माझा interview चांगला झाला नाही आणि आनल्या तेव्हा मला म्हणे...जाऊदे रे..रिलायन्सच्या फुल्या फुल्या फुल्या...  फार फालतू लोक आहेत साले... बरे झाले नाही झाले ते..

दुसऱ्या दिवशी माझे ऑफर लेटर आले मग म्हणे ठीक आहे, पगार तर चांगला आहे ना... वर्षभरात बघ नवीन जॉब...

मित्र हवे तर असे... नेहमी सोबत असणारे... सोयीने वागणारे तर फेसबुकवर पण असतात... हाहाहा

love you #KGMS

टीप : इकडे सगळे तसे नाहीत हे विशेष नमूद करतो. I am thankful to fb for adding people from totally different spheres into our lives...

Friday, 8 April 2016

कपूर अँड सन्स... एक वेगळा प्रयत्न..

कपूर अँड सन्स... एक वेगळा प्रयत्न..

या घरातल्या प्रत्येकाला वाटत असते की समोरच्याने आपल्याला फसवले आहे किंवा आपल्यापासून काही लपवले आहे. मुलांच्या बाबांनी आपला बँकेचा जॉब सोडून घरासाठी मोठे काही करावे या हेतूने बिझनेस करायचा प्रयत्न केलेला असतो पण तो अयशस्वी झाल्याने घरात बिकट परिस्थिती उद्भवलेली असते.

ह्या सगळ्यात ज्या बायकोने साथ द्यावी तीच जर टोमणे मारणारी असेल आणि सतत माहेरचे गोडवे गाणारी असेल तर घराचा नरक होतो. एखादी व्यक्ती आयुष्यातून न जाणे हा  नरक आहे असे वपु म्हणतात पण या दोघांमध्ये नवीन व्यक्ती आल्याने त्यांचे घर नरक बनते.

त्यांचा मोठा मुलगा आदर्श आणि यशस्वी लेखक असतो आणि लहान मुलगा स्ट्रगलिंग लेखक आणि पार्ट टाईम बारटेंडर, आईबाबांचा नावडता आणि अयशस्वी माणूस... दोन भावांमध्ये असलेली लव हेट रिलेशनशिप, त्यांचे disturbed आईबाबा आणि हे सगळे लांबून पाहत असलेले त्यांचे जिंदादिल आजोबा ऋषी कपूर...

नवर्याला सतत टोचणारी रत्ना पाठक मला जगातली सर्वात कुरुप स्त्री वाटली पण हे अर्थातच तिच्या अभिनयाचे यश आहे. रजत कपूरचा सतत काळजीत असणारा बाबा सुद्धा आपल्याला अगदी जवळचा वाटतो. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ने मोठ्या भावाचे काम अगदी सुंदर केले आहे, truely impressive.. सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयातील  मर्यादा वेळोवेळी स्पष्ट होतात पण तो असह्य होत नाही.

आणि या सगळ्यात एक गोड फुल आहे आलिया भट.. वरवर पाहता अवखळ पण गंभीर व्यक्तिमत्व तिने फार छान सादर केले आहे.

करण जोहर या सिनेमाचा निर्माता असल्याने यात एक 'गे' पात्र अपेक्षितच होते; पण या वेळी ते पात्र लाऊड नसून मनाला भिडणारे आहे. गे असण्यातली शारीरिक बाजू न दाखवता मानसिक बाजू दाखवल्याने हे पात्र आपल्यावर छाप सोडून जाते.

इतर फॅमिली सिनेमांसारखा हा सिनेमा रिफ्रेशिंग नाही उलट आपल्याला अस्वस्थ करून जातो... But still I loved it and could correlate real persons with on screen characters..

Friday, 1 April 2016

ईकॉमर्स आणि आऊटसोर्सिंग...दोन भयंकर राक्षस...

ईकॉमर्स आणि आऊटसोर्सिंग...दोन भयंकर राक्षस... 󾆬󾆲󾆬😈󾆰

कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या ईकॉमर्स आणि मोबाईल अँप कंपन्यांमुळे बऱ्यापैकी कॉलेजेस मध्ये शिकलेल्या लोकांचे करिअर आणि ऊमेदीची काही वर्षे वाया जात आहेत.

मोठ्या कॉलेज मध्ये शिकलेले अतिहुशार मुलं किंवा आमीरजादे 2,3 वर्षाच्या अनुभवावर असले धंदे चालू करतात आणि Venture Capital कडून फंडिंग मिळवतात.. त्या जोरावर चांगल्या पगारावर मुलांना मार्केटिंगला ठेऊन 6 महिने--वर्ष,2वर्ष काढतात आणि जमले तर ठीक नाहीतर गाजराची पुंगीच ती... नाही वाजली तर मोडून खातात... त्यांनी आपले खिसे आधीच गरम केले असल्याने पुढची 10 वर्षे मजेत जगू इतके पैसे बाजूला काढतात आणि नवीन आयडिया काढून लोकांना मूर्ख बनवायच्या कामाला लागतात...

अशाच एका 43 देशात operational presence असलेल्या वल्ड फेमस ई-कॉमर्स कंपनीमध्ये (Groupon) आम्ही साडेतीन वर्ष काम केले आहे... सुरवातीला वाटायचे अरे आपणच मागास आहोत, जग फार बदलतेय... इतक्या कमी वयात लोक हे सगळे करतात आणि आपण नुसतेच झाडं मोजत बसलोय...

सुरवातीची उत्सुकता संपली की मग एकेक गोष्टी खटकत जातात आणि प्रश्न पडतो की अरे हे सगळे सध्या चांगले आहे..पण sustainable वाटत नाही... पुढे काय??? कंपनीच्या बेसिक्स मध्येच प्रॉब्लेम असेल तर ही अस्वस्थता वाढत जाते...

पुढे काय??? या प्रश्नाचे उत्तर डायरेक्टर लोकांकडेही नसते म्हणून ते आपल्याला महिन्याला 40% रेट ने होणारी राक्षसी ग्रोथ दाखवून इम्प्रेस करायला बघतात... सोबतची आमीरजाद्यांची निर्बुद्ध गर्दी आपल्याला मूर्ख ठरवते... आपण जास्त विचार करू नये हे ते ओरडून सांगत असतात...

काही काळ गेल्यावर मोजकेच अपवाद वगळता या कामात मिळवलेल्या स्किल्स बाहेरच्या जगात अगदीच कुचकामी आहेत हे सगळ्यांना समजते... बाहेर आपली किंमत शून्य होते... आणि या फेज मध्ये कंपनी आपले वर्चस्व प्रस्थापित करते..

कंपनीच्या बेसिक्स मध्येच घोळ असल्याने मग हळूहळू फॉरेन फंडिंग आटत जाते आणि लोकांना जॉबवरून कमी केले जाते... मोठ्या (डायरेक्टर) लोकांना हे वादळ 6 महिने आधीच दिसत असल्याने जहाज बुडायच्या आधीच ते सुरक्षित बेटावर उंदरासारख्या उड्या मारतात...आणि बाकीचे  loyalty च्या नावाखाली हात हलवत बसतात...

हे बाकीचे ना इकडचे ना तिकडचे असतात.. मुंबईतल्या वेश्याव्यवसायतुन अनेक मुली पळून जाण्यात यशस्वी होतात पण त्यांना बाहेर कोणी उभे करत नाही आणि त्या परत त्याच दारात जातात तसेच या लोकांचे होते... त्यांना चांगल्या इंडस्ट्री मध्ये कोणीच उभे करत नाही आणि ते परत नवीन स्टार्टअप च्या शोधात फिरायला लागतात.. मग नवीन कंपनी कशी sustainable आहे हे आपापल्या घरी सांगतात.. पण त्यांना मनात माहित असते की आपण एक-दोन वर्षाने इकडे नसू...

असे कित्येक लोक जॉबलेस झालेले आम्ही पाहिलेत... फुग्याला टाचणी लागल्यावर तो क्षणार्धात फाटतो तसे यांचे होते... ऐन तिशीच्या उंबरठ्यावर हे clueless होऊन इकडेतिकडे फिरत असतात... चकचकीत ऑफिस आणि अंगावर ब्लेझर असले तरी आतली insecurity यांना रात्री स्वस्थ झोपू देत नाही...

लोकांना (employees) आपल्यावर डिपेंडंट बनवून नंतर त्यांना मंद बनवण्यात यांची स्पर्धा आऊटसोर्सिंग कंपन्यांशी आहे. अतिशय फालतू कामासाठी खूप चांगला पगार देऊन हुशार ब्रेन्स कुजवणाऱ्या या इंडस्ट्रीमुळे भारत महासत्ता होण्याचे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही याची आम्हाला खात्री आहे...मग कुणी पेसीमिस्टिक म्हणाले तर आपली त्याला हरकत नाही...

टीप : या क्षेत्रामुळे काय चांगले बदल झाले ते आम्हाला नव्याने सांगायची गरज नाही... आम्हाला या वाया जाणाऱ्या लाखो  लोकांबद्दल काळजी आहे... मूठभर tech savvy लोकांबद्दल नाही...सरकार DIPP च्या माध्यमातून यांच्यावर चांगले नियंत्रण ठेवेल अशी आशा आहे...